या पुस्तकात समाविष्ट असलेले लेख भारतीय संदर्भात नद्यांचे विविध पैलू उजळणारे आहेत. सांस्कृतिक इतिहास, पुरातत्त्वविद्या, संस्कृत आणि प्रादेशिक वाङ्मयीन परंपरा, लोकसाहित्य आणि संतसाहित्य, भारतविद्या आणि पर्यावरणशास्त्र अशा विविध विद्याशाखांमधल्या अभ्यासकांनी भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीला आकार देणार्या नद्यांचे गतिशील रूप इथे उलगडले आहे. नद्यांनी भूगोलाच्या शुचितेला कशी प्रेरणा दिली आहे, काठावरच्या मानवी वसाहतींचे जगणे त्यांनी शतकानुशतके कसे तोलून धरले आहे, सृष्टिचक्राला त्यांनी कशी गती दिली आहे, कलावंतांच्या प्रतिभेला त्यांनी कसे स्फुरण दिले आहे, वेगवेगळ्या प्रदेशांत राहणार्या निरनिराळ्या समुदायांमध्ये पिढ्यान् पिढ्या गुंजत राहणार्या कथा-गीतांची निर्मिती त्या कशा करत राहिल्या आहेत, आणि आधुनिक काळात नद्यांचा विचार करताना, नद्यांची परिसंस्था सृष्टीच्या संतुलनाकरता कशी आवश्यक आहे, हे या पुस्तकातून उलगडत जाते. यामुळे नद्यांचा सामग्र्याने विचार करण्यासाठी एक उत्तम साधन अभ्यासकांच्या हातात येऊ शकेल.